जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा द्यावा – रोहित पवार
समोरासमोर येऊन तुम्ही तुमचे कामे सांगा मी माझे सांगतो रोहित पवार यांचे प्रा. राम शिंदे यांना आव्हान
राम शिंदे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला उभे राहिला पाहिजे होते, त्यांना निवडून येण्याची खात्री नसल्याने व आपली आमदारकी चार वर्षे राहणार आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी राजीनामा दिला नाही असे वक्तव्य आमदार रोहित दादा पवार यांनी व्यक्त केले. तसेच तुम्ही मंत्री असताना काय केले किती निधी आणला मी कोणते कामे केले व किती निधी आणला हे सांगतो असे आव्हान रोहित पवार यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना दिले.
कर्जत जामखेड मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण मला सेवेची संधी दिल्यामुळे मी मतदार संघाचा विविध योजनांसाठी करोडो रुपयांचा निधी कमी कालावधीत खेचून आणला तसेच पाच वर्षात कोणाचेही काम असो किंवा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हे न बघता प्रत्येकाचे काम केल्यामुळे मोठे समाधान मिळाले असल्याचे आमदार पवार म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादीचे नेते मंगेश आजबे, माजी सभापती सूर्यकांत मोरे, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर राळेभात, रमेश आजबे, रामहरी गोपाळघरे काका गर्जे,सागर कोल्हे, चत्रुभुज बोलभट इत्यादी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून प्रत्येकाची कामे केली आहेत, मी कोणत्या पक्षाचाही आहे हे कधी बघितले नाही सायकल वाटप असो लहान मुलांची बेबी किट किंवा टँकरने पाणी वाटप अशा अनेक विविध योजनांच्या माध्यमातून जनतेस सहकार्य केले आहे.
तसेच माजी मंत्री आमदार राम शिंदे हे निवडून आल्यानंतर त्यावेळी म्हणत होते की, मुंबईला राहायला मला आवडते मतदारसंघात तेच प्रश्न, तेच कामे, तोच दुष्काळी भाग, सतत येडे गबाळे लोक मला सारखी भेटतात त्यामुळे मला मुंबईलाच राहायला बरे वाटते असे त्याकाळी म्हणणारे हे महाशय कसले भूमिपुत्र म्हणून घेतात असा सवाल आमदार पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधीने लोकांची कामे करावी लागत असतात परंतु आमदार शिंदे हे मंत्री असताना पुढे मागे पोलिसांच्या लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरत होते कोरोनाच्या काळात जनतेची सेवा न करता हे स्वतःच्या बंगल्यात झाडांना पाणी मारत होते, आम्ही कोविडच्या काळात लोकांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठे कोविड सेंटर उभे केले व लोकांचे आरोग्य जपले,जनावरांना लंपी रोग झाला त्यावेळी आ.शिंदे हे गायब झाले होते.
आम्ही त्यावेळी शेतकऱ्यांच्या दुबत्या गायीचे नुकसान होऊ दिले नाही व जिल्ह्यात सर्वात जास्त जनावरांना लंपीच्या लसी दिल्या. शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा विमा उपलब्ध केला, तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना हळगाव येथील साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचा प्रश्न मिटवून जास्तीचा दर पुढच्या काळात देणार असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना पूर्ण ताकतीने सुरू ठेवणार असून, येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे राजकारण हे कर्जत,जामखेड करांना विचारल्याशिवाय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सोनेगावचे चत्रुभुज बोलभट व त्यांच्या 87 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला तसेच दौंडवाडी मुंगेवाडी, सातेफळ, तरडगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमास खर्डा पंचायत समिती गणातील हजारो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वारे यांनी केले व आभार वसंत सानप यांनी मानले.