Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू; जाणून घ्या कधी होणार परीक्षा ?

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू; जाणून घ्या कधी होणार परीक्षा ?

0
241
जामखेड न्युज – – – 
 महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. नोंदणीसंदर्भात सविस्तर कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. सीईटी परीक्षेची नोंदणी व परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
*सीईटी परीक्षेची नोंदणी कुठे कराल?*
यावर्षी प्रथमच नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतरच एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. महाराष्ट्रात यावर्षी प्रथमच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकनातून जाहीर करण्यात आला आहे. सीईटी नोंदणी सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट- cet.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in वर लॉगइन करून अर्ज करू शकतात.
*एफवायजेसी सीईटी 2021 ही ऐच्छिक परीक्षा*
यावर्षी MSBSHSE  तर्फे अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार घेतली जात आहे, परंतु ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यायची असेल तर ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील. परीक्षेला बसण्याची कुणावरही सक्ती नाही. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे नामांकित महाविद्यालय मिळवयाचे असेल तर ते विद्यार्थी अकरावी सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळवून त्यांच्या आवडीच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर करू शकतील.
*परीक्षेचा तपशील कसा असेल?*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले की, एफवायजेसी सीईटी 2021 यंदा 21 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल. 20 जुलै रोजी अर्थात आज परीक्षा फॉर्म जाहीर केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाणार आहे. राज्य मंडळाशी संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी लागू असेल आणि शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली बोर्ड किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येईल.
*यावर्षीचा दहावीचा निकाल*
• यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यभरात 957 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत.
• 90% पेक्षा जास्त टक्के मिळवणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत.
• 1,28,174 विद्यार्थ्यांनी 85 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवले आहेत.
• तसेच 80 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!