जामखेड न्युज——
जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
नगरपरिषदेचे दुर्लक्ष
घाणीच्या साम्राज्यमुळे डासांचा उपद्रव वाढला
जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. ही कुत्री अंगावर येत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना शहरातून वावरताना दक्षता घ्यावी लागते. मोटारसायकलस्वारांच्या मागे कुत्री लागत असल्याने मोटारसायकल चालविताना कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कुत्रे, डुकरे यांच्या उपद्रवाबरोबरच घाणीच्या साम्राज्य मुळे डासांचा उपद्रव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिंगल पट्टी तर काही ठिकाणी अर्धवट रस्ते आहेत यामुळे वाहतूक कोंडी होते यातच रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. एखाद्या नागरिकांने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येतात. मोटारसायकल मागे लागल्याने अनेक मोटारसायकल स्वार घसरून पडून जखमी झाले आहेत.
सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी वावरत आहेत. यात सुमारे पंधरा ते वीस कुत्र्याच्या झुंडी च्या झुंडी रस्त्यावर फिरत आहेत. ही कुत्री बीड रोड, नगर रोड, तपनेश्वर, सदाफुले वस्ती, पेठ, पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वावरत असून, यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास ती अंगावर येत आहेत. या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व लहान बालके यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. कधीही कुत्री अंगावर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्यांचा चावाही या कुत्र्यांनी घेतल्याचे नागरिक सांगतात.
अनेक वेळा मोटारसायकलला कुत्री आडवे आल्याने
अनेक जण पडून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
चौकट
शहरात चिखल, दलदल याच बरोबर घाणीच्या साम्राज्य आणि आता मोकाट कुत्रे, डुकरे यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. तसेच घाणीच्या साम्राज्य मुळे मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.