जामखेड न्युज——
पिंपळवाडी (साकत) चा पुल खचला, वाहतूक ठप्प

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांनी या मार्गी जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, अंमळनेर कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात यात अनेक बस पण याच मार्गी जातात पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

पिंपळवाडी ग्रामस्थांनी भर पावसात नदी किनारी येऊन वाहनचालकांना आवाहन केले व वाहने माघारी पाठवले काही बस तसेच मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने माघारी गेले.

साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.

आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच पिंपळवाडी जवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पुलच खचलेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हा पुल पीएमजेएस कडे आहे. मोजमाप झाले आहे पण काम कधी होणार हीच नागरिकांना प्रतिक्षा आहे.
आज झालेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता यातच जनार्दन घोलप यांच्या शेळ्या वाहून चालल्या होत्या शेळ्या पकडण्यासाठी ते गेले असता तेही वाहून चालले होते पण सुदैवाने ग्रामस्थांनी ताबडतोब मदत केली व शेळ्या व घोलप यांना बाहेर काढले.
पुल खचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. अनेक नागरिक अडकलेले होते तेव्हा पिंपळवाडी चे ग्रामस्थ दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, ईश्वर घोलप, मनोज नेमाने, शरद घोलप धीरज नेमाने, प्रविण घोलप, विशाल मोहिते यांनी नागरिकांना मदत केली तसेच वाहनचालकांनी या मार्गी न येता साकत पाटोदा मार्गी जावे असे आवाहन केले.





