जामखेड न्युज – – –
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये आज सकाळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकी दरम्यान आतापर्यंत भारतीय सैन्याच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. आता जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. भारतीय सैन्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.
दहशतवादी लपून बसल्याची मिळाली होती माहिती
पुलवामा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर सैन्यांच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यानंतर दहशतवादी आणि जवानांनामध्ये गोळीबार सुरु झाला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अजूनही या भागात दोन दहशतवादी लपून बसले आहेत.
लष्कर-ए-तौयबाचा कमांडर अबू हुरैरा ठार
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचा कमांडर अबू हुरैरा याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांचे मृतदेह ही जवानांनी ताब्यात घेतले आहेत. आयजीपी काश्मीरने सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा आहे. यासह दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले आहेत. तथापि, अद्याप सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.
एका महिन्यात 12 दहशतवादी ठार
जुलै महिन्याच्या 14 दिवसात जम्मू काश्मीरमध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी 2 जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर 8 जुलै रोजी 2 पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले. 12 जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.