जामखेड न्युज——
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!!
कर्जत जामखेड मतदारसंघ हा आवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे. अशातच जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षाही पाऊस कमी झाल्याने कर्जत-जामखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळी विजेचा लपंडाव होत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्जत जामखेड तालुक्यातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना स्वतंत्रपणे निवेदनाद्वारे विजेचा नियमित पुरवठा व पूर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विनंती केली आणि उचित निर्णय नाही झाला तर आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
कुकडी व सीना प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे काही आवर्तने या तालुक्याला मिळतात. अशातच कुकडीच्या पाण्याचा लाभ तालुक्यातील बऱ्याच गावांना होत असतो याबरोबरच उजनी जलाशयातील फुगवट्याच्या पाण्याचा लाभ व भीमा आणि सिना नदीकाठच्या अनेक गावांना पाणी शेतीसाठी उपलब्ध आहे. परंतु मागील काही दिवसांपासून विजेचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध असलेले पाणीसुद्धा पिकांना देण्यासाठी अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने वीज पुरवठा नियमित व पुरेशा दाबाने उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. तसेच सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शासन स्तरावरून भारनियमन केले जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु असे न करता शेतकऱ्यांना उपलब्ध होणारी वीज ही दिवसा किमान दहा ते बारा तास उपलब्ध होईल, याबाबत देखील दक्षता घ्यावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
दिवसा किमान १० ते १२ तास वीज न मिळाल्यास शेतकऱ्यांना बरोबर घेऊन महावितरणसमोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विजेच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून शेतकऱ्यांना पुरेशी व नियमित वीज मिळावी यासाठी ते आग्रही असल्याचे पाहायला मिळते.