खंडणी देण्यास नकार दिल्याने जामखेडमधील तीन कलाकेंद्राची तोडफोड
तीन वर्षे शांत जामखेड पुन्हा दहशतीखाली ?
कलाकेंद्र चालकांना हप्ता मागितल्यावर कलाकेंद्र चालकांनी न दिल्याने शहरातील तीन कलाकेंद्रावर गुंडाच्या टोळीने धुडगूस घालत लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने साहित्यांची तोडफोड करत कलाकेंद्रावर दगडफेक केली. या प्रकरणी एकुण सात ते आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षे शांत असलेले जामखेड पुन्हा दहशतीखाली येत आहे. अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये होत आहे.
या प्रकरणी अक्षय उर्फ चिंग्या मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) तुषार पवार,(पुर्ण नाव माहीत नाही) सोम्या पवार (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. जांबवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर व इतर 4 ते 5 अनोळखी युवक अशा एकुण 7 ते 8 जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी झंकार सांस्कृतिक कला केंद्र, जगदंबा सांस्कृतिक कला केंद्र नगर रोड जामखेड व भाग्यलक्ष्मी कला केंद्र बीड रोड जामखेड या तीन कलाकेंद्रावर येऊन म्हणाले की, तुम्हाला कलाकेंद्र चालवायचे असतील तर तुम्ही आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल मात्र कलाकेंद्र चालकांनी हप्ता देण्यात नकार दिल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने या तिन्ही कलाकेंद्रावर धुडगूस घालण्यास सुरूवात केली या नंतर या आरोपींनी कलाकेंद्राच्या खिडक्यावर दगडफेक केली तसेच काही आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कलाकेंद्रातील खुर्च्या, कुलर, गाड्या, पीओपीची मोडतोड करत नुकसान केले.
आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी कलाकेंद्राच्या मालकिण लता शालन जाधव, कलावंतीनी, निता खवळे बारामतीकर, शारदा खवळे बारामतीकर या तिघी जखमी झाल्या. तसेच आरोपी टोळके यावर न थांबता कलाकेंद्र चालकांना जाताना म्हणाले की, तुम्ही जर आता हप्ता दिला नाही तर तुम्हाला बघून घेऊ म्हणून शिवीगाळ केली.
या प्रकरणी फिर्यादी लता शालन जाधव (वय ५५)सांस्कृतिक कलाकेंद्र मालक यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात ते आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.
चौकट
जामखेड परिसरात अनेक टोळ्या तीन वर्षांपासून जामखेड शहर शांत होते. आता पुन्हा जामखेड शहरात दहशत, दादागिरी वाढली आहे. टोळ्या पुन्हा बाहेर निघू लागल्या आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारत आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा टोळ्यांचा उद्रेक पुन्हा सुरू झाला आहे.