जामखेड न्युज——
गुरव समाजासाठी संत काशिबा विकास योजनेची सुरुवात करत पन्नास कोटीची घोषणा
गुरव समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत संत काशिबा युवा विकास योजना सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी ५० कोटी रुपयांचे भांडवल देण्यात येईल. पुढे आवश्यकतेनुसार योजनेचा विस्तार करून निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. ११ डिसेंबर) सोलापुरात केली.
गुरव समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन आज सोलापुरात आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संत काशिबा विकास योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, समाजाच्या मागण्या सरकारी पातळीवर तातडीने सोडविण्याचे आश्वासनही दिले.
शिंदे म्हणाले की, थोड्या वेळापूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. आता सोलापुरात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोर्कापण झाले. फडणवीसांच्या संकल्पनेतील प्रकल्प पूर्ण करण्याचे समाधान मला लाभले आहे. पुण्याचे काम केल्यानंतर गुरव समाजाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही मुंबईला कसे जाणार. तुमचे दर्शन घेण्यासाठीच आम्ही सोलापूरला आलो आहोत.

गावांतील मंदिराचे पावित्र्य, मांगल्य जपण्याचे काम हा गुरव समाज करत असतो. या समाजाचे स्थान महत्वाचे आणि मोठे आहे. गुरव समाजाच्या मागण्यांचा सरकारी पातळीवर नक्की विचार करण्यात येईल. त्यातूनच ओबीसी महामंडळांतर्गत संत काशिबा विकास योजना सुरू करण्यात येईल. त्यासाठी सुरवातीला ५० कोटी रुपयांचे भांडवल देण्यात येईल. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. गुरव समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम आमचे सरकार करते आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय समाजहिताचाच आहे. तुम्ही केलेल्या कामाची दखल घेणे, हे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळेच आम्ही केलेल्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी समाधानी होते.
सोलापूरच्या प्रश्नाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच, आम्हाला थोडं जागं राहावं लागतं. कारण त्याची आता गरज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
जामखेड राष्ट्रीय गुरव समाजाचे उदयकुमार दाहीतोडे, किरण दाहीतोडे व समस्त गुरव समाजातर्फे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांचे शतशः आभार मानले.










