जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये उद्या मोफत मराठा वधु-वर मेळावा
इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा प्रश्न गंभीर स्वरुपात वाढलेला आहे. या प्रश्नाकडे समाजाचेही दुर्लक्ष आहे. त्यासाठी जगदंब फाउंडेशन संचलित मराठी सोयरीक संस्थेने २० नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच जामखेड मध्ये आयोजित केलेल्या मोफत मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे.

रविवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता केशर हॉल, जामखेड या ठिकाणी राज्यस्तरीय भव्य मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यापूर्वी जामखेड मध्ये कधीही असा वधू वर मेळावा झालेला नाही त्यामुळे जामखेड सह आसपासच्या तालुक्यातील वधू वर व पालकांना या मेळाव्याची उत्सुकता लागलेली आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सर्व क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी बघायला मिळतील. स्वतः वधू वरांनी हजर राहणे गरजेचे आहे, अशी माहिती कर्जत- जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर (आबा) राळेभात, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे मंगेश आजबे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, संभाजी ब्रिगेडचे अवधुत पवार, मराठा सेवा संघाचे राम निकम शिवव्याख्याते गणेश भोसले, शिवस्फूर्ती समुहाचे अशोक पठाडे, नितीन घालमे, प्रताप पवार, जयश्री कुटे व इतर सदस्यांनी केले आहे.

या मेळाव्यात विधवा, विदुर, घटस्फोटीत हे देखील स्थळे बघायला मिळणार आहेत. त्यामुळे अशा इच्छुक वधू-वरांनी पुनर्विवाहासाठी जरूर यावे. मेळाव्यामध्ये समोरासमोर वधू-वरांना पाहता येते, चर्चा करता येते. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली जगदंब फाउंडेशन अंतर्गत मराठी सोयरीक ही शासन मान्य नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक शिक्षक, शेतकरी, महिला वर्ग, विविध शासकीय कर्मचारी, अधिकारी मोठ्या आवडीने लग्न जमवण्याचे कार्य करतात. या सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत ६३ वधु वर
मेळावे झाले आहेत. २५०० लग्न जमलेले आहेत. त्यापैकी ४५० लग्न हे पुनर्विवाहाचे जमलेले आहेत. आज-काल स्थळ भेटत नसल्यामुळे पालकांना वधू-वरांना प्रचंड समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे अशा मेळाव्याची गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त वधू-वर पालकांनी मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी व भविष्यात कोणत्याही मेळाव्यासाठी ७४४७७८५९१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या मराठा समाजामध्ये विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील काळात झालेल्या स्त्री भ्रूण हत्येमुळे मुलींचे प्रमाण कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. वधू – वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी केले आहे.





