जामखेड न्युज——
करिअर कट्टा मार्गदर्शन, जुगाड काढत संकटावर मात करणं हे तरुणाईचं लक्षण असावे – यशवंत शितोळे
घडून गेलेल्या घटनांवर रडत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत जुगाड काढत संकटावर मात करणं हे तरुणाईचं लक्षण आहे. तरुणांनी वायुच्या वेगाने करियर पर्यत पोहचण्यासाठी करियर कट्टाची निर्मिती आहे असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
जामखेड येथील जामखेड महाविद्यालय जामखेड येथे गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत करिअर कट्टा उपक्रमाचे विस्तारित स्वरूप समजून घेण्यासाठी विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन वर व्याख्यान आयोजित केले होते.जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुनील नरके सर होते.
प्रमुख मान्यवर यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा चे स्वरुप वैशिष्ट्य आणि गरज समजावून सांगताना बरेच संदर्भ दिले.
आजतागायत कट्ट्यावर चर्चिले गेलेले म्हणजे कट्यावर हजर नसलेल्या मित्र मैत्रिणींचे विषय,काल सिरियल मधे घडलेल्या घटना असे पारंपरिक विषय बदलून स्पर्धा परीक्षा व उद्योग क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन ते विषय कट्यावर आणण्यासाठी करियर कट्याचे आयोजन असून यातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात आठवड्यातून तीनदा आय ए एस व आय पी एस आपल्या भेटीला आणि उर्वरित दिवसात उद्योजक आपल्या भेटीला अशा अभिनव उपक्रमांसोबतच यु पी एस सी आणि एम पी एस सी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव म्हणजे जवळपास वर्षभराचे व्यस्त नियोजन या करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर पर्यत नेऊन ठेवते असेही त्यांनी नमूद केले.
युद्ध हरल्यानंतर पराभूत सैनिक सुखरुप कसे परत येईल याचा आधीच विचार करणारा शुरसम्राट सेनापती नेपोलियन बोनापार्ट यांचं उदाहरण देवून प्लॅन बी ची तयारी कशी करावी या बद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले.
लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं तरुणांबद्दल बोललं जातं पण जामखेड कॉलेजचा तरुण जिथं पाणी असेल तिथंच लाथ मारतो असे छोटेखानी विनोद साधत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा समारोप केला
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुनील नरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभ्यासक्रमात असलेले सगळेच विषय महत्त्वाचे असतात म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा विषय निवडून करियरचा मार्ग शोधला पाहिजे, स्वतःची पात्रता ओळखून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने योजना आखून ती अधिक स्पष्टपणे समजून घ्यायची असेल तर करियर कट्टा हे एक उत्तम माध्यम असल्याचंही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज समन्वयक प्रा.काशीद राजेश यांनी केले तर आभार प्रा.मिसाळ आणि सुत्रसंचलन प्रा.नितीन तरटे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.