आमदार रोहित पवार आयोजित भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद!!!

0
232
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्राच्या विविध भागातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गुरुवारी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर या भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या स्पर्धेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
महाराष्ट्राच्या विविध भागातून 500 पेक्षा अधिक बैलजोडींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच 25 हजारांहून अधिक नागरिक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी व थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्जत शहरात आले होते. एकूण 22 लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना आमदार रोहित पवारांच्या वतीने देण्यात आली आहेत. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या अंतिम  स्पर्धेत एकूण 7 पारितोषिके देण्यात आली. त्यापैकी  प्रथम क्रमांक सचिन चव्हाण यांनी पटकावला आहे. तसेच द्वितीय क्रमांक माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रूप यांनी पटकावला आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान किशोर भिलारे यांना मिळाला आहे.
प्रथम क्रमांक आलेल्यांना 2 लाख 22 हजार 222 रुपये तर द्वितीय आलेल्यांना 1 लाख 11 हजार 111 तर तृतीय क्रमांक आलेल्यांना 77 हजार 777 रुपये व सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 बैलाचे सजविण्याचे साहित्य विकणाऱ्यापासून ते शर्यत आयोजित केलेल्या ठिकाणी छोटेखानी व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना आणि अशा सर्वांनाच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धांमुळे होत असतो.  गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल तसेच आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील विद्यमान राज्यमंत्री अदिती ताई तटकरे आणि राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील आमदार देखील उपस्थित होते.  त्यामध्ये आ. अशोक बापू पवार, आ.अनिल पाटील, आ. संग्राम भैय्या जगताप, आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके, आ. राजू नवघरे, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले , आ. संजय मामा शिंदे, आ. दिलीप काका बनकर, आ. यशवंत माने, आ. इंद्रनील नाईक , आ.अतुल बेनके, आ. ऋतुराज पाटील, आ. झीशान सिद्दिकी, आ.राहुल जगताप यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here