जामखेड न्युज – – – –
केदारपूर (ता.निलंगा) येथील विवाह सोहळ्यातील जेवणातून दोनशे ते तीनशे वऱ्हाडी लोकांना रविवारी (ता.२२) पंक्तीतून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु, देवणी तालुक्यातील वलांडी व जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे, की निलंगा (Nilanga) तालुक्यातील केदारपूर येथील मुलीच्या विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी (ता. २२) दुपारी १२.३० वाजता केदारपूर येथे संपन्न झाला. लग्न लागल्यानंतर केदारपूर, काटेजवळगा, जवळगा, अंबुलगा बु, सिंदखेडसह अनेक गावातून लग्न कार्यासाठी आलेल्या वऱ्हाडी लोकांनी भात, वरण, बुंदी, चपाती आणि वाग्यांच्या भाजीचे जेवण केले होते. जेवनानंतर सर्व वऱ्हाडी आपल्या गावी निघून गेले. (Two Hundred People Suffer Food Poisoning In Nilanga Taluka Of Latur)
मात्र सायंकाळी ६ ते ७ वाजल्यापासून सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. पोट दुखणे, उलट्या, जुलाब असा प्रकार वऱ्हाडींना होत असल्याने देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवळगा, जवळगा उपकेंद्र व काही जण खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेले जवळपास दोनशे ते ते तीनशे वऱ्हाडीवर उपचार सुरू आहेत. ही विषबाधा वरणातूनच झाली असावी असा अंदाज असून विषबाधा ज्या लोकांनी वरण खाल्ले आहेत. त्यांनाच विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. तर वरण न खाणाऱ्या वऱ्हाडीना काही झाले नाही, असे उपचार घेत असलेले वऱ्हाडी सांगत आहेत. लहान मुलांना याचा मोठा त्रास होत असून पोटात दुखत असल्याने व उलट्या होत असल्याने त्याना त्रास सहन करावा लागत आहे. अंबुलगा बु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र माकणे, आरोग्य कर्मचारी जगदीश सगर यांनी काटेजवळगा केदारपूर येथील वऱ्हाडींना रूग्णवाहिका पाठवून विषबाधा झालेल्या लोकांना वेळेत आणून उपचार केले. रात्रभर त्यांच्यावर उपचार केल्याने त्यांची तब्येत बरी आहे. परंतु अजूनही असे रूग्ण येत आहेत असे त्यानी सांगितले. ( Latur Updates)
रुग्णांवर उपचारअंबुलगा बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७० रूग्णांवर उपचार केले असून त्यांच्या उलटीचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात आल्याचे त्यानी सांगितले. रूग्णावर त्यांच्यावर योग्य उपचार केला जात आहे. सध्या अनेकांची प्रकृती बरी झाली असून त्यांच्यात सौम्य लक्षणे जाणवत आहेत. तसेच आज सकाळी नवीन आणखी १० असे रूग्ण आले आहेत. अजूनही रूग्णसंख्या वाढत आहे. त्यांच्यावरही उपचार चालू आहेत.