जामखेड न्युज – – – – –
एक दशकांपूर्वी कोरोना सारखी प्लेगची साथ आली तेव्हा राजर्षी शाहूं महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्या प्रजेचे प्राण वाचवले ती उपाययोजना आज एवढ्या प्रगत अवस्थेत असताना आपण करू शकत नाही . 1898 च्या दुष्काळात एक ही माणूस अन्न नाही म्हणून मृत्यू पावला नाही. सर्वात पहिली रोजगार हमी योजना राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती, संकट काळात राज्यकर्त्यांनी कसे वागावे हा आदर्श राजर्षी शाहू महाराजांकडून घ्यावा, असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज साहित्य प्रकाशन समितीचे सचिव व जेष्ठ संपादक डॉ विजय चोरमारे यांनी केले .
ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
राजश्री शाहू महाराजानी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी काम केले नाही ,असे कोणतेही क्षेत्र नाही सर्व क्षेत्रात त्यांनी काम करताना समाजातील सर्व घटकांना समोर ठेऊन प्रयत्न केले. शिक्षण, विद्यार्थी वसतिगृह, अस्पृश्यता निवारण, शेती, शेतकरी विकास , पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, अल्पसंख्याक समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळात आरक्षण कायदा केला, आंतरजातीय विवाह कायदा केला , एवढेच काय विधवा पुनर्विवाह कायदा केला फक्त कायदे करून थांबले नाहीत तर आंमलबजावणीही काटेकोरपणे केली. या सर्व बाबतीत त्यांनी केलेल्या कामाला आपण आजही समाधानकारक रित्या पुढे नेऊ शकलो नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दलित समाजाचे स्वतः नेतृत्व न करता “आता डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमचे नेतृत्व करतील” अशी घोषणा करून त्यांना खंबीर पणे साथ देणारा लोकोत्तर राजा पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले.
आजच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शाहूं महाराजाचा पुरोगामीत्वाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे , राजर्षिंनी त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारी पिढी त्यांच्या हयातीतच तयार केली होती . फक्त भाषणाने आणि कपडे बदलल्याने नेतृत्व करता येत नाही, तर जनहिताचा निर्णय घेऊन तो अंमलात आणणारा नेता असावा लागतो ते सर्व कर्तृत्व राजर्षी शाहूं कडे होते. तो विचार कृतीत आणावा लागतो .
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नंदकुमार झावरे पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष हा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या बलिदानातुन प्रेरणा घेऊन व राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्शावर शंभरवर्षं सुरू आहे. व बहुजन , आदिवासी वंचित घटकातील मुले मुली आज शिक्षण घेत आहेत . आम्ही हा विचार घेऊन पुढे ही चालत राहू अशी ग्वाही दिली .
या प्रसंगी विचारपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामचंद्र दरे सचिव मा. जी. डी. खानदेशे , सहसचिव अँड. विश्वासराव आठरे पाटील , विश्वस्त मा. मुकेशदादा मुळे ,कार्यकारिणी सदस्य मा. अँड. वसंतराव कापरे, प्रा. अर्जुनराव पोकळे , अँड. माणिकराव मोरे , मा आदितीताई नलावडे ,मा.स्मिता पानसरे संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा . जी. डी. खानदेशे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ भास्करराव झावरे यांनी मानले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता ठुबे यांनी केले.




