जामखेड न्युज – – –
राज्यात मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना दरम्यान अनेकांचा मृत्यू झाला होता. आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळावी यासाठी जोरदार मागणी केली जात होती. अखेर मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
कुटुंबीयांना १० लाखांची मदत केली
राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरी मिळणे गरजेचे आहे. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात येणार असल्याचे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत केली होती. आता मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
या जिल्हयात मिळाली मदत
एकून ३४ कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालनामधील ३, बीडमधील ११, उस्मानाबादमधील २, नांदेडमधील २, लातूरमधील ४, पुण्यातील ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यावेळी आभार मानले होते.
३४ युवकांच्या कुटुंबीयांना मदत
आरोग्यमंत्री राजेश टोपे काही दिवसांपूर्वी मदत दिल्याबाबत ट्वीट केले होते. त्यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्याने मराठा समाजातील ३४ युवकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्यात आल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले होते.









