लग्नातील सत्कारावरून वाद, तलाठ्याने माईक मारला डोक्यात, ग्रामपंचायत सदस्य जखमी
नाव माईकवरून न पुकारल्याच्या किरकोळ कारणावरून राजेवाडी येथील एका लग्न समारंभात तलाठी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात हाणामारी झाली. या वादात तलाठ्याने हातातील माईक हिसकावून ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तलाठ्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 11/07/2025 रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात घडली.
काय घडले? जवळा गावातील बिभीषण शिवाजी लेकुरवाळे यांच्या मुलीचा विवाह राजेवाडी येथे होता. लग्नाला आलेल्या नातेवाईकांचे व गावकऱ्यांचे माईकवरून स्वागत करण्याचे काम जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक रामचंद्र पठाडे, वय 37, व्यवसाय शेती हे करत होते.
यावेळी तलाठी शिवाजी सखाराम हजारे हे दारू पिऊन तेथे आले. पठाडे यांनी आपले नाव माईकवरून का पुकारले नाही, या कारणावरून त्यांनी पठाडे यांना शिवीगाळ केली. वाद वाढताच हजारे यांनी हाताने पठाडे यांच्या तोंडावर मारले आणि त्यांच्या हातातील माईक हिसकावून त्यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात अशोक पठाडे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीसात गुन्हा दाखल या प्रकरणी जखमी अशोक पठाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व सरकारी कामात अडथळा या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
लग्नासारख्या मंगलप्रसंगी झालेल्या या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे.