जामखेड न्युज – – –
कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरल्यानंतर आता राज्य सरकार सध्या नोकर भरतीवर विशेष लक्ष देत आहे. राज्यभरात रिक्त असणाऱ्या विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यातच आता शिक्षक भरतीचा मुहुर्त ठरला असून यादरम्यान राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी माहिती दिली आहे.
राज्यातील एकूण 2062 जागांसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 3902 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया खाजगी शिक्षण संस्थातील जागांसाठी आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. या भरती बाबत अंतिम शिफारस पाठवण्यात आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. त्याचसोबत उमेदवारांना मुलाखतीसाठी शुभेच्छा सुद्धा वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या शिक्षकांच्या अंदाजे 40 हजार जागा रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभाग ही प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवत आहे. सरकारने सध्या 6100 जागा भरण्यासाठी मंजूरी दिली आहे. या जागा टप्याटप्याने भरण्यात येणार आहेत. परिणामी शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.










