साकत परिसरात वीजेच्या तुटलेल्या तारेला चिटकून दोन बैलांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले
नुकसान भरपाईची मागणी
जामखेड तालुक्याच्या सीमेवरील साकत शिवारात आज हृदयद्रावक घटना घडली संभाजी नवनाथ वराट हे शेतीच्या मशागतीसाठी बारला शिवारात बैलगाडी घेऊन चालले होते. बैलगाडीत पाच जण होते. रस्त्यावर विजेची तार तुटलेली होती. या तारेवरून बैलगाडी गेली बैलांचा तारेला स्पर्श होताच करंट बसून बैलांचा जाग्यावर मृत्यू झाला सुदैवाने गाडीतील पाच जण थोडक्यात वाचले.
आज सोमवार दि. २५ रोजी दुपारी संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीचे काम करण्यासाठी बैलगाडी घेऊन साकत कडभनवाडी येथील बारले शिवारात चालले होते. यावेळी संभाजी वराट बरोबर बैलगाडीतून शहाजी महादेव वराट, संगिता शहादेव वराट, सोहम संभाजी वराट, एकनाथ नारायण वराट असे पाच जण होते. रस्त्यावर तुटलेल्या तारेवरून बैल चालले असता बैलांचा तारेला स्पर्श झाला यावेळी करंट बसून बैलांचा जाग्यावर मृत्यू झाला बैलगाडी ला टायरचे चाके असल्याने गाडीला करंट आला नाही यामुळे गाडीतील पाच जण बचावले बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
बैलजोडी रस्ता ओलांडत असताना बैलांला तारेचा स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने दोन्ही बैल जागीच कोसळले. मात्र शेतकरी व इतर चार जण बचावले
१ लाख ५० हजारांचे नुकसान, शेती खोळंबली मृत बैलांची बाजारभावानुसार किंमत सुमारे १.५० लाख रुपये आहे. “पेरणी तोंडावर आली असताना बैल गेले. आता नांगरणी, मोगडा पाळी कशी करायची? सरकारने तातडीने मदत द्यावी,” अशी मागणी संभाजी वराट यांनी अश्रू अनावर होत केली.
घटनेची माहिती मिळताच महावितरण चे वायरमन सावंत, पशुवैद्यकीय अधिक्षक डॉ. मोटेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आता मृत बैलासाठी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्याला महावितरणकडून मदत मिळण्यासाठी सर्व प्रकिया लवकरात लवकर केली जाईल असे महावितरण चे अभियंता शिंदे यांनी सांगितले.