जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सुरू पण अतिक्रमणे जैसे थे!!
अतिक्रमणामुळे शहराच्या पाणीपुरवठा पाईपलाईन साठी गटाराबाहेर जागाच नाही
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी होणार आहे. मुळातच शंभर फुटाचा रस्ता नव्वद फुट केला आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे जैसे थे आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी मुग गिळून गप्प आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अतिक्रमणे निघाली पण जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे. जामखेड शहरातील जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाल्याने गोरगरीबांची दुकाने व टपर्या पुर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. मात्र बीड रोडवरील धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच व रस्ता रुंदीकरण न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. गरीब टपरी धारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले मात्र प्रशासनाने बीडरोडवरील ‘त्या’ दुकानांच्या अतिक्रमला पाठींबा दिला का ? असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे सामान्यकडून प्रशासनाच्या चलढकलपणा भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
जामखेड शहरातून सौताडा जामखेड महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षपूर्वीपासून अत्यंत संथ गतीने सुरु असून या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे. काही भागात रस्त्याचे काम सुरु आहेत तर काही भागात काम थांबविण्यात आले आहे, हा रास्ता करताना रस्त्याच्या मध्यंग पासून दोन्ही बाजूस ५० – ५० फुटा पर्यंत रस्ता करण्यात येणार होता मात्र बांधकाम विभागाकडून रास्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर राष्ट्रीय महामहार्गाकडून मिळेल त्या जागेत रस्त्याचे काम सुरु केल्याने काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी मोठा रस्ता करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता नागरिकांच्या हक्काच्या जागेला धक्का न उर्वरित नियमाप्रमाणे अतिक्रमण काढणे अपेक्षित असताना गोरगरिबांचे अतिक्रमणांवर पहिला हातोडा घातला छोट्या व्यावसायिकांनी आपल्या टपर्या, पत्रे, शेड, दुकानासमोरील उभारलेले फ्लेक्स तसेच काही बांधकाम काढून घेतले पण पक्के कामे मोठ मोठ्या व्यापारी इमारती तशाच आहेत.
बहुतेक ठिकाणावरील व्यापार्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्याने रस्ते मोकळा श्वास घेत असतानाच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्याच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरु करण्यात आले मात्र खर्डा रोड, नगर रोड, बीड रोड या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नगरपरिषदेची स्वतंत्र गटार व पाणी योजनेसाठी जागा सोडलेल्या जागेवरतीही पुन्हा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे भविष्यत गटार व पाणी योजना रविबण्यासाठी पुन्हा पुन्हा अतिक्रम मोहीमच राबवत राहायची का ? प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर शहराचा कायापालट होण्यास वेळ लागला नसता मात्र जामखेड मधील ढिम्म प्रशासन या बाबतीत मुख्य कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
गोरगरिबांना उठ, धनदांडग्यांना सूट !
मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.
चौकट
राज्यभर शासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला जोर दिला असताना प्रशासनाने जिल्ह्यात काही तालुक्यात अतिक्रमण मोठ्या काढत असतानाच जामखेड शहरात व तालुक्यात नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांच्या ढिम्म कामामुळेच शासनाच्याच मोहिमेला एकप्रकारे खो दिला जात आहे. अतिक्रमण मोहीम रावबिण्यास ‘जामखेड प्रशासनानाला वेळ मिळत नसल्याचे’ चित्र निर्माण झाले आहे.