जामखेड न्युज – – –
महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून, गृह विभागाकडून शासन आदेश जारी केलाय. शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून 5 जुलै 2021 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अनुषंगानं धोरणात्मक बाबींचा निर्णय असल्यानं तो गृह विभागांतर्गत पोलीस भरतीसाठी लागू करणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवणार
सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया 2019 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती
या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.
डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती
दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली होती. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं.
पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळावीत
दिलीप वळसे पाटील म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली होती. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली होती.
सर्वसामान्यांना सौजन्याची वागणूक द्या
सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.