सर्वात मोठ्या सृजन भजन स्पर्धेत मुंबईच्या साई प्रासादिक भजनी मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक देशभरातील १२०० पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग

0
181
जामखेड न्युज——
अनेक दिवसांपांसून प्रतीक्षा असलेली ‘अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धा – २०२२’ च्या चौथ्या पर्वाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ 27 ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात बारामतीत झाला.
 आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून या भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुंबईच्या साई प्रासादिक भजनी मंडळाने स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. शिरसाई प्रासादिक भजनी मंडळ, पुणे यांनी दुसरे तर सूरताल भजनी मंडळ कोकण यांनी तिसरे पारितोषिक पटकावले. राज्यातील विविध संतपीठांचे प्रमुख विश्वस्त, पदाधिकारी या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या स्पर्धेची सांगता झाली.
यंदा प्रथमच देशपातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातून एकूण १२०० पेक्षाही अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यांच्या भजनाचे सुरेल स्वर बारामतीच्या शारदा संकुलाच्या परिसरात सकाळपासूनच निनादत होते. आबा परकाळे, सुनील काटे, ज्ञानपर्व संस्थेचे अरुण काशीद, विद्या काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत माऊली सावंत, श्रीधर भोसले, रामेश्वर डांगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
‘अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धे’त कर्जत-जामखेड गटातून स्वरविहार भजनी मंडळ (कर्जत) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पवनसुत भजनी मंडळ (जामखेड) यांनी द्वितिय तर मुक्ताई भजनी मंडळ (कर्जत) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर दक्षिण विभाग या गटात नादलहरी भजनी मंडळ (तामिळनाडू) यांनी पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. शारदा संगीत विद्यालय (गोवा) यांनी द्वितीय तर दीपा वादन विद्यालय संगीत आणि सांस्कृतिक कला मंच (कर्नाटक) यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले. अनेक भजनी मंडळांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. एकापेक्षा एक श्रवणीय भजने या स्पर्धेच्या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळाली. 
आपली अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा ही केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही तेवढ्याच भक्तिभावाने जपली जात असल्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने आला. राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या समता, एकात्मता, बंधुता या बाबी अध्यात्माच्या माध्यमातून जपल्या आणि जोपासल्या जातात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या अनुषंगाने ‘सृजन भजन स्पर्धा’ भरवून हे महत्त्व अबाधित राखण्याचे काम आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here