एका व्यक्तीच्या विचाराने चालणाऱ्या देशाला गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात – आमदार रोहित पवार

0
254
जामखेड न्युज – – – – 
सध्या रशिया-युक्रेनमध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. त्यावरूनच आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी रशिया आणि भारताची तुलना केली आहे. सद्यपरिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेंव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं, असं रोहित पवार म्हणाले.
रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या अहंकारामुळे संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अहंकाराने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय, अशी टीका रोहित पवारांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर केली. तसेच लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
   भारताबाबत काय म्हणाले रोहित पवार? -भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल. पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात. आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं. याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे, असा निशाणा रोहित पवारांनी मोदी सरकारवर साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here