जामखेड न्युज – – – – –
परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात ऊसतोडणीसाठी व आपला चरितार्थ चालवण्यासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोपींची कुलपे तोडून बाजरी व इतर धान्य इंडिका गाडीत भरून पलायन करणाऱ्या चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शेळ्या चोरीचीही कबुली दिली आहे.
अमोल रमेश सुलताने (मूळ रा.मूर्तिजापूर, जि. अकोला, हल्ली रा.कनगर, ता. राहुरी) व गीता अमोल सुलताने अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार सुनिल सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भिमराज निकम (सर्व रा.राहुरी) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येसवडी गावच्या शिवारात ऊसतोडणीसाठी आलेल्या अप्पा धनंजय भिल्ल (रा. काकडदा, ता.शहादा जि.नंदुरबार) या ऊसतोड मजुराच्या बंद कोपीचे कुलूप तोडले व आरोपींनी कोपीतील १०० किलो बाजरी इंडिका (क्र. एमएच ४२ ए १४११) गाडीत भरून घेऊन जात असताना पोलिसांनी अमोल सुलताने, गीता सुलताने या दोन आरोपींना राशीन येथे ताब्यात घेतले. आरोपींवर कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अटक आरोपींना कर्जत न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतला आहे. पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत अधिक तपास केला असता अमोल सुलताने व अनिल ऊर्फ भीमराज निकम यांनी कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील दोन ठिकाणावरून शेळ्यांची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमोल याच्यावर मूर्तिजापूर शहर आणि ग्रामीण या ठिकाणी यापूर्वीचे १२ गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे, तुळशीराम सातपुते हे करत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीराम सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती काळे, आण्णासाहेब चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली आहे.





