जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरं थंडीने गारठून गेली आहेत. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराज्याच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या 27 डिसेंबर रोजी राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 28 डिसेंबर रोजीही काही भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडली आहे. नागपूर व गडचिरोलीत कमाल तापमानात घसरण झाली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. हिवाळ्यात पाऊस झाल्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. विदर्भ, मराठवाड्यातही पावसांमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. त्यातच नवीन वर्ष सुरू होण्याआधी राज्यात पावसाच्या सरी पुन्हा बरसणार आहेत.
28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर, 27 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, डिसेंबरच्या मध्यानंतर उत्तरेकडील शीतलहरींचा महाराष्ट्रातून दक्षिणेकडे प्रवास सुरू झाल्याने गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवली. गेल्या तीन दिवसांपासून नागपुरातील किमान तापमानात चार ते साडेचार अंशांनी घट नोंदवण्यात आली. सोमवारी शहरात 7.6 असे या मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले.
कडाक्याच्या थंडीने दोघांना प्राणही गमवावे लागले. दरम्यान, बुधवारी नागपुरात 8.5, तर गडचिरोलीत 8.4, अमरावती 8.9, गोंदिया 9.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदा हिवाळ्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला थंडीचा कडाका जाणवला नाही. मात्र, निरभ्र आकाश असल्याने थंडी जाणवत आहे.









