Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जगाला आज बंदुकीची नाही…सदभावनेची गरज सायकल यात्रा शिबिरात डॉ. सुब्बराव यांचे प्रतिपादन

जगाला आज बंदुकीची नाही…सदभावनेची गरज सायकल यात्रा शिबिरात डॉ. सुब्बराव यांचे प्रतिपादन

0
253
जामखेड न्युज – – – 
     जगभरात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर बंदुकीची नाही, तर एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, सेवा आणि प्रार्थनेची गरज आहे. सदभावना यात्रेच्या माध्यमातून युवा पिढीला हे “शांती- शस्त्र” मिळेल, अशी ग्वाही ९४ वर्षांचे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डाॅ. एस. एन. सुब्बराव तथा भाईजी यांनी गुरूवारी नगर येथे बोलताना दिली.
स्नेहालयाच्या वतीने , गांधीजयंतीच्या दिवशी, 2 आॅक्टोबरला नगरच्या किल्ल्यापासून  “भारत-बांगलादेश सदभावना सायकल यात्रे” सुरू होत आहे. यात्रेच्या तयारीसाठी केडगावमधील स्नेहांकुर प्रकल्पात आयोजित शिबिरात भाईजी बोलत होते.
 एनसीसीच्या  ५७, महाराष्ट्र बटालियनचे कर्नल पंकज सहानी, ईश्वरजी , सुवालाल शिंगवी, अॅड. श्याम आसावा,लेफ्टनंट अंकुश आवारे  आदी यावेळी उपस्थित होते. सदभावना वृक्षाला पाणी घालून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
*देश की ताकद*
डॉ. सुब्बराव यांनी गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून युवा यात्रेकरूंशी संवाद साधला. “नौजवान आओ रे…नौजवान गाओ रे…इस महान देश को नया बनाओ रे…” ,एक दुलारा देश दुलारा – प्यारा हिंदुस्तान  …ही गाणी तरुणाईसोबत भाईजींनी जोशात गायली.
68 कोटी  नौजवान हीच देशाची ताकद,भविष्य आणि इज्जत असल्याचे सांगून भाईजी म्हणाले, भारताची राष्ट्रशक्ती ही विविधतेमध्ये आहे. अन्न, भाषा, पोषाख वेगवेगळे आहेत. इतकी विविधता अन्य कुठल्याही देशाला लाभलेली नाही. अध्यात्माचा मोठा वारसा आम्हाला मिळाला आहे. विज्ञानानं हात टेकले की अध्यात्मच उपयोगी पडतं. शस्रास्रांवर अब्जावधी रूपये खर्च करण्याऐवजी सदभावना वाढीला लागली तर प्रश्न सुटतील.
*जीवन बदलाची यात्रा*
कर्नल सहानी म्हणाले, ही सायकल यात्रा युवक- युवतींचे जीवन बदलणारी ठरेल. विविध प्रांत, तिथले लोक, त्यांची संस्कृती पाहताना तुमचाही दृष्टीकोन बदलू लागेल. या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली, हे तुमचं फार मोठं भाग्य आहे.
प्रास्ताविकात स्नेहालयाचे संस्थापक  डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी  5 राज्य आणि बांगलादेशात यात्रा नेण्याचे उद्देश सांगितले.
प्रारंभी अनामप्रेमच्या प्रकाशगान वाद्यवृंदाने रवींद्रनाथ टागोरांचे “एकला चलो रे..” हे बंगाली भाषेतलं गाणं सादर केलं.
अहमदनगरचा ऐतिहासिक वारसा , सद्भावना आणि सामाजिक एकतेची परंपरा, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याबद्दल भूषण देशमुख यांनी सायकल यात्रींशी संवाद केला.
 सूत्रसंचालन सायकल यात्रा प्रमुख विशाल अहिरे यांनी, तर आभारप्रदर्शन योगेश गवळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!