जामखेड न्युज – – – – – –
लोकसहभागातून उभी राहिली ‘ज्ञानगंगा’, बावीच्या जिल्हा परिषद शाळेची तालुक्यात आदर्श वाटचाल
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक, मुख्याध्यापक अमोल पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, शिक्षकांचे समर्पण, माजी विद्यार्थ्यांची साथ आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या जोरावर जामखेड तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ग्रामीण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेच्या २०२४-२५ टप्पा क्रमांक दोनमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून या शाळेने आपल्या गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे शाळेचे पदवीधर शिक्षक तथा मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बावी शाळेच्या विकासामागे केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी उभारलेला लोकसहभाग हा प्रमुख आधार ठरला आहे. पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघ, शिक्षणप्रेमी नागरिक आणि शिक्षकांनी एकत्र येत सुमारे सहा लाख रुपयांपेक्षा अधिक लोकवर्गणी उपलब्ध करून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठी भर घातली. त्यामुळे शाळेचा परिसर अधिक सुरक्षित, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झाला आहे.

डिजिटल शिक्षणामुळे ज्ञानाच्या नव्या वाटा
शाळेत प्रोजेक्टर, टॅब, इंटरॲक्टिव्ह बोर्ड, स्मार्ट टीव्ही तसेच वाय-फाय नेटवर्कशी जोडलेला आधुनिक संगणक कक्ष उपलब्ध आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून ई-लर्निंग साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून नवे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत आहे.
शाळेत चार प्रशिक्षित शिक्षक असून सर्व शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ व २ उत्तीर्ण आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर विशेष भर
नवोदय, शिष्यवृत्ती, मिशन आरंभ, मंथन आदी परीक्षांसाठी दररोज अतिरिक्त तासिका घेतल्या जातात. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता चौथीचे चार विद्यार्थी, इयत्ता पाचवीची एक विद्यार्थिनी आणि इयत्ता सातवीचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले.
विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती, वाचनक्षमता आणि सामान्यज्ञान वाढविण्यासाठी ‘वुई लर्न इंग्लिश’, ‘मी ज्ञानी होणार’, तारखेनुसार पाढे पाठांतर, स्पेलिंग बी, रीडिंग बेल, वाचन महोत्सव, वॉटर बेल आणि कुसुमाग्रज वाचन अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात.




