जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. राज यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं विश्लेषणही रोहित पवार यांनी केलं आहे.
रोहित पवार यांनी दोन ट्विट करून राज यांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राज यांच्या प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ
राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज काय म्हणाले?
अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
मिटकरींचा हल्ला
राज यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हल्ला चढवला आहे. ‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.










