रोहित पवारांच्या समर्थनार्थ नान्नजचे डॉ. कुमटकर अन्नत्यागावर; “रुग्णसेवा सुरूच राहणार”
शेतकऱ्यांच्या विनाअट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नान्नज येथील गजानन हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाबासाहेब कुमटकर यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
तिसऱ्या दिवशीही शासनाची दखल नाही, म्हणून डॉ. कुमटकर मैदानात
आ. रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी पोहोचले असून, अद्याप शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीला बळ देण्यासाठी व रोहित पवार यांना पाठिंबा म्हणून डॉ. कुमटकर यांनी नान्नज येथूनच अन्नत्यागाचे हत्यार उपसले आहे.
“फक्त पाणी, बाकी अन्न वर्ज्य; पण रुग्णसेवा अविरत”
माध्यमांशी बोलताना डॉ. बाबासाहेब कुमटकर म्हणाले, “आजपासून मी कोणतेही अन्न ग्रहण करणार नाही फक्त पाणी पिणार. मात्र माझे दैनंदिन कामकाज, आयपीडी, ओपीडी, पेशंट तपासणे हे सर्व नियमितपणे सुरूच राहणार आहे. माझ्या आंदोलनामुळे एकाही रुग्णाच्या सेवेत अडथळा येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन.”
“मी डॉक्टर आहे, पण आधी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सामाजिक जाणिवेतून मी हा अन्नत्याग करत आहे. रोहित पवार यांनी उचललेला हा लढा एकट्याचा नाही, तो समस्त शेतकऱ्यांचा आवाज आहे” असेही डॉ. कुमटकर यांनी स्पष्ट केले.
नान्नज परिसरातून पाठिंबा
डॉ. कुमटकर यांच्या या निर्णयानंतर नान्नज व परिसरातील शेतकरी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. गजानन हॉस्पिटल समोर “शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे”, “रोहित पवार आगे बढो” अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनाची पार्श्वभूमी
दुष्काळ, अवकाळी पाऊस व शेतमालाला भाव न मिळाल्याने जामखेड-कर्जत मतदारसंघातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी विनाअट कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आता त्याला डॉक्टर वर्गातूनही पाठिंबा मिळू लागल्याने आंदोलनाला नवी धार मिळाली आहे.
“पांढरा कोट घालून रुग्णसेवा करतो, पण रक्त शेतकऱ्याचेच आहे. कर्जमाफी झाल्याशिवाय अन्नाला स्पर्श करणार नाही” – डॉ. बाबासाहेब कुमटकर
“शेतकऱ्यांसाठी डॉक्टरही उपाशी”
डॉ. कुमटकर यांची प्रकृती स्थिर असून, ते नियमितपणे रुग्ण तपासत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.