श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सप्त गड कोटांवरून शिवतीर्थ जल आणण्यासाठी 16 मे रोजी जामखेड येथून शिवभक्त रवाना होणार
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती, जामखेड यांच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी लागणारे पवित्र ‘शिवतीर्थ जल’ आणण्यासाठी सप्त गडकोटांची २ दिवसीय यात्रा शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता जामखेड येथून रवाना होणार आहे.
किल्ले तोरणा, किल्ले राजगड, किल्ले रोहिडेश्वर, सरसेनापती येसाजी कंक यांचा वाडा, किल्ले कावळ्या, राजधानी किल्ले रायगड व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे समाधीस्थळ या पवित्र ठिकाणांहून शिवभक्त जल आणणार आहेत. या जलाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पहाटे शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक केला जाणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग मधुकर भोसले यांनी सांगितले की, “प्रतिवर्षीप्रमाणे आपण गडकिल्ले व तीर्थक्षेत्र या ठिकाणाहून जल घेऊन येतो. या शिवतीर्थ यात्रेतून तरुणांना गडकिल्ले, सह्याद्री व आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची जाणीव होते.
हा उत्सव जामखेडकरांचा गावचा उत्सव झाला आहे. नागरिक, माता-भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी होतात. बाहेर कामानिमित्त, शिक्षणानिमित्त गेलेले सर्वजण आवर्जून या उत्सवासाठी येतात.”
यात्रा निघण्याचे ठिकाण: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, तहसील पटांगण, जामखेड. वेळ दि. १६ मे २०२६, शनिवार, रात्री ठीक १०:३० वाजता.
आयोजकांनी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेसाठी दोन दिवसाची शिदोरी, अंथरूण-पांघरूण, काठी, बॅटरी, पाण्याची बाटली व वारकरी टोपी सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी संपर्क: धीरज पाटील – ७०२८५३३०१४, नागेश आरेकर – ८१४९०८४८१७