जामखेड न्युज—–
जामखेड शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला – अवधुत पवार

-
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने शहराचा विकास खुंटला आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केले.

जामखेड शेजारी आष्टी, पाटोदा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे हटवून सुसज्ज रस्ते झाले आहेत मात्र जामखेड मधील काही अतिक्रमणे निघाली पण काही मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमचीच झाली आहे. नेमके ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही. अतिक्रमणे निघत नाहीत. याला अभय कोणाचे आहे. याचीच चर्चा सुरू आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम करताना गटारांचे काम कसे का असेना झाले आहे. अनेक ठिकाणी वाकडे तिकडे गटार झाले आहे.

गटाराबाहेर नगरपरिषदेची दहा फूट जागा आहे पण सध्या अनेक ठिकाणी गटारावर पक्के काम करून टपऱ्या टाकल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ मोठ्या लोकांनी भाड्याने दिल्या आहेत. तेव्हा नगरपरिषद हे अतिक्रमण केव्हा हटवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
अतिक्रमण हटल्याशिवाय विकास अशक्य आहे.शहरातील रस्ते नियमानुसार रोड सेंटरपासून १५-१५ मीटर म्हणजे पूर्ण ३० मीटर रुंदीचे झाले पाहिजेत.खरेदी खतानुसार जागा मोजून उर्वरित सर्व अतिक्रमण तत्काळ हटविणे अत्यावश्यक आहे.












