तपनेश्वर शाळेतील चिखलप्रश्नी आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना उपाययोजना करणार
प्रशासन व्यस्त, अधिकारी मस्त, कर्मचारी सुस्त!
जामखेड शहरात प्रशासन झोपेत असल्याचे चित्र दिसत असून, अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आणि कर्मचारी कामात उदासीन असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. “प्रशासन व्यस्त, अधिकारी मस्त, कर्मचारी सुस्त” ही उक्ती सध्या अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मूलभूत सोयींसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशाच पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या चिखलामुळे लहान मुलांना (विद्यार्थ्यांना)शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर परिसरात दुर्गंधीमुळे पालक आणि शिक्षकही त्रस्त आहेत.
या परिस्थितीची दखल घेत आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आकाश बाफना यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून चिखलमुक्त परिसर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनानेही जबाबदारीने लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही आदर्श फाउंडेशनच्या या पुढाकाराचे कौतुक करत सामाजिक संस्थाच आता प्रशासनाला जागं करत आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.