जामखेड न्युज – – –
केंद्र सरकारने 102 व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; परंतु आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत हटत नाही, तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नाही. ही मर्यादा उठवावी व राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे इंपिरिकल डाटाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले._
पूरग्रस्त, दरडग्रस्त भागासाठी कायमस्वरूपी धोरण
निसर्ग, तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना केली तशीच मदत आताही पूरग्रस्तांना केली आहे. यासाठी राज्य शासनाने ११ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत आहे. पूर आणि दरडग्रस्त भागासाठी कायमस्वरूपी सर्वंकष धोरण आखणार आहोत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
कोरोनाशी मुकाबला सुरूच
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले असून तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने राज्य शासनाने आपली तयारी केल्याचे स्पष्ट केले. दोन चाचणी प्रयोगशाळांची संख्या आता 600 वर गेली. विलगीकरण रुग्णशैय्यांची संख्या 4.5 लाखांहून अधिक केल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात आयसीयूच्या 34 हजार 507 तर ऑक्सिजनच्या एक लाख दहा हजार 683 खाटा उपलब्ध असल्याची ठाकरे यांनी दिली. 13 हजार 500 व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत असेही ते म्हणाले.
जिनोम सिक्वेन्सिंग लॅब
विषाणू आपला अवतार झपाट्याने बदलत आहे त्याचे परिणाम लक्षात घेऊन वेळेत उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सींग लॅब सुरू केली आहे. त्याचा राज्याला उपयोग होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची ऑक्सिजन निर्मिती आजही प्रतिदिन 1300 टन आहे. गेल्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1700-1800 टन ऑक्सिजन दररोज लागला. आपण ऑक्सिजन स्वावलंबन धोरण राबवित असलो, तरी तातडीने ऑक्सिजन निर्मितीला मर्यादा आहेत. इतर राज्यात आता पुन्हा रुग्णवाढ दिसू लागली आहे. त्याचा अंदाज घेऊन राज्यात पुन्हा रुग्णवाढ झाली तर नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
काही ठिकाणी निर्बंध शिथील; पण
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी या दिशेने योग्य पावले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी अशी विनंती त्यांनी केली.










