स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे अजून निश्चित नसले, तरी प्रशासनाने त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. राज्यातील ग्रामपंचयातीचे सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 हजार 586 ठिकाणी सरपंच पद राहणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच, इच्छुकांनी बांधणीला सुरवात केली आहे.
राज्यातील 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत सरपंच पदाचे आरक्षण सरकारच्यावतीने निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र (Maharashtra) शासन राजपत्र यामध्ये 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात राज्यात अनुसूचित जातीसाठी 3 हजार 258, अनुसूचित जमातीसाठी 1 हजार 84, ओबीसीसाठी 6 हजार 115 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 हजार 586 ठिकाणी सरपंच पद राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अ. नगर जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी झाल्यापासून विहित काळात सोडतीद्वारे सरपंच पद आरक्षण निश्चिती विहित प्रक्रियेनुसार करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने गुरुवार दि.१२ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १ हजार २२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी (एससी) १५० जागा सरपंच पदाच्या आरक्षित. यातील ७५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ११९ जागा सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. यातील ६० जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी ३३० जागा सरपंचपदासाठी आरक्षित आहेत. यातील १६५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातून ६२४ जागा आहेत. यातील ३१२ महिलांसाठी राखीव आहे.
तसेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार आहे.
२०२५ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ६, संगमनेर २, कर्जत २, पारनेर २, जामखेड ३आणि अकोले तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.