साकतमध्ये संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न
जामखेड तालुक्यातील साकत येथे महान संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला हरिजागर, टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक, किर्तन सोहळा व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा कमिटीचे कार्यकारी संचालक भाऊसाहेब सानप तसेच कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी, हनुमान वाडी, साकत समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी रात्री भजन, बुधवारी सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात गावात भव्य मिरवणूक नंतर अकरा ते एक हभप उत्तम महाराज वराट यांचे सुश्राव्य किर्तन व नंतर महाप्रसाद अशा विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
साकत परिसरातील ज्यांना गहिनीनाथ गडावर जाणे शक्य होत नाही त्यांच्या साठी भाऊसाहेब सानप यांनी गावातच ग्रामस्थांच्या सहकार्याने पुण्यतिथी सोहळा साजरा करतात. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हजेरी लावतात.
वामनभाऊ महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले. आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला.
भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत, त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो, आबालवृद्ध भक्त येथे ‘भाऊंच्या’ समाधीच्या दर्शनाला येतात.
हे त्याचे भाग्य थोर असले तरी.नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माउलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या ४० दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यंच्या पुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले ‘आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर.’ आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले.
संत वामनभाऊ जीवन संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित करणारे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज. डोंगर दऱ्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. ‘भाऊ ‘ हे अतिशय कडक स्वभावाचे होते. असे म्हटले जाते. परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेऊ घातले होते. या महात्म्याचा हाच एक प्रसंग. पौष् वद्य ७/८ हा संत वामनभाऊंच्या पुण्य स्मरणाचा दिवस. ‘भाऊ ‘ श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत यादवबाबा यांचे उत्तराधिकारी झाले. यानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरु केले.
आजीवन ब्रह्मचार्यव्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधूने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागे.आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे. म्हणून बरेच लोक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्तांचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामनगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात.