Thursday, February 12, 2026
Home राजकारण ट्रिपल इंजिन सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच कुणाकुणाला संधी, कुणाची बढती तर...

ट्रिपल इंजिन सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच कुणाकुणाला संधी, कुणाची बढती तर कुणाला डच्चू ?

0
952

जामखेड न्युज——

ट्रिपल इंजिन सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच कुणाकुणाला संधी, कुणाची बढती तर कुणाला डच्चू ?

 


येत्या 27 जूनला महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्याआधीच बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ होण्याचं बोललं जातंय. यात तिन्ही पक्षांमधून कुणाची वर्णी लागेल? कुणाचा पत्ता कट होईल आणि कुणाची खाती बदलली जातील? यावरुन विविध तर्क लावले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नवी मुंबईतून भाजप नेते गणेश नाईकांना संधी मिळू शकते. केंद्रात नारायण राणेंना पुन्हा संधी न मिळाल्यामुळे त्यांचे पुत्र नितेश राणेंना संधी मिळणार का? याचीही चर्चा आहे. पुण्यातून ३ टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळांची मंत्रीमंडळात वर्णी लागू शकते. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसलेंचंही नाव चर्चेत आहे. मुंबईतून भाजपचे अतुल भातखळकर तर मराठवाड्यातून राणाजगजितसिंह पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश धस यांचीही नावं आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, आशिष जैस्वाल आणि भरत गोगावलेंची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावं आघाडीवर मानली जात आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या विस्तारात सध्या महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं खातं बदललं जावू शकतं. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचंही खातं बदलू शकतं. वन आणि सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांचं खातं बदलू शकतं. ज्यांचं प्रमोशन होऊ शकतं, अशा चर्चेतल्या नावांमध्ये भाजपचे रविंद्र चव्हाण आहेत, ते सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. मंत्री गिरीश महाजनांचं प्रमोशन होऊ शकतं. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे.

भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. “केंद्रातल्या मोदींच्या मंत्रिमंडळाचा कोरम पाहता राज्यात 15 मंत्री करण्यासाठी स्कोप आहे. मात्र मला मंत्री पद मिळेल की नाही हे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत आहे मी काय सांगू, मागच्या मंत्रिमंडळात मी चांगलं काम केलं. त्यामुळे मला आशा आहे, ट्रिपल इंजिन सरकारमधला हा तिसरा आणि दिर्घकाळ लांबलेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार ठरणार आहे”, अशी प्रतिक्रिया लोणीकर यांनी दिली.


तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
30 जून 2022 ला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली. पहिले चाळीस दिवस फक्त शिंदे आणि फडणवीसच कारभार चालवत होते. नंतर 9 ऑगस्टला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला., शिंदेंच्या शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतरही महाराष्ट्रात 22 मंत्रिपदं रिक्त होती, महाराष्ट्रात एकूण ४२ मंत्रीपदं आहेत, पण विस्तार फक्त २० मंत्र्यांचाच झाला होता. नंतर बरोब्बर वर्षभरानं म्हणजे २ जुलैला अजित पवार गट सत्तेत गेला, आणि तिसरा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला
अजित पवार गटाचे ९ नेते सत्तेत मंत्री झाले. आणि आता जवळपास वर्षभरानंच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. कायम प्रतीक्षेत राहिलेल्या शिंदे गटाच्या भारत गोगावलेंना तरी यावेळच्या विस्तारात लालदिवा मिळतो का? याचीही प्रतीक्षा आहे.

या घडीला मुख्यमंत्री शिंदेंकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-जनसंपर्क अशी ७ खाती आहेत. तर फडणवीसांकडे गृह, जलसंपदा, विधी व न्याय, उर्जा आणि राजशिष्ठाचार अशी 5 खाती आहेत. सत्ता स्थापनेच्या 2 वर्षानंतरही या खात्यांचं वाटप झालेलं नाही. 27 जूनला महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. तर 12 जुलैला समारोप होणार आहे. 28 जूनला 2024-25 सालचा अंतरिम अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!