जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – ( सुदाम वराट) –
कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू व्हावी, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे.यानुसार कोविडमुक्त असलेल्या गावांमध्ये आठवी ते १२वीचे वर्ग सुरु होणार आहेत. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. पण दुसरी लाट आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आता आमचे संपूर्ण लक्ष हे येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आहे. कोरोना काळात मुलांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. शाळा सुरू होणार असल्या, तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरू होऊ शकणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत.
१५ जुलैपासून महिनाभर कोरोना नसलेल्या आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत. शासनाने दिलेल्या एसओपीची अंमलबजावणी या ठिकाणी व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
काही गाव आणि शहरांमध्ये कनेक्टीव्हीटी किंवा इलेक्ट्रीसिटी नसल्याने डिजीटल शिक्षण देण्यात अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा ठिकाणी देखील नियमांचे पालन करुन ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. कोविडमुक्त गावातील शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ जुलैला परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार आखून दिलेले नियम शाळांना पाळणे बंधनकारक आहे.