जामखेड न्युज——
रक्षा विसर्जन पाण्यात न करता वृक्षारोपणासाठी वापर करत वराट कुटुंबीयांनी जपला आधुनिक विचार
वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक बाजीराव गणपती वराट (वय ९४) यांचे रात्री वृद्धापकाळाने निधन झाले आज त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम झाला यावेळी राख व अस्ती पाण्यात विसर्जित न करता शेतातच खड्डे करून त्यात राख टाकण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. यामाध्यमातून पारंपरिक पद्धतीला फाटा देणाऱ्या वराट कुटुंबीयांचे सर्वत्र काैतुक होत आहे.
मृतकावर अंत्यसंस्कार केल्यानंतर लाकडाची होणारी राख आणि अस्ती नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्याची परंपरा पूर्वापार पासून चालत आलेली आहे ; मात्र रुढी, परंपरेला फाटा देत बाजीराव वराट याचा मुलगा बाबासाहेब वराट, मुलगी, नातू दिनेश वराट, दिपक वराट, बंकट वराट व सर्व पाहुणे मंडळीनी राख व अस्तींचे विसर्जन पाण्यात करण्याऐवजी शेतातच खड्डे करून त्यात ते टाकून वृक्षारोपण करण्याची इच्छा उपस्थितांसमोर व्यक्त केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांसमक्ष हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
परिसरात ते नाना नावाने परिचित होते. भजन, किर्तनात गोड गायनाबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांनी गावात भजन व बारशीचे कार्यक्रम सुरू केले होते ते आजतागायत सुरू आहेत. तसेच सुमारे बारा वर्षे सायकलवर पंढरपूर वारी केली. काही दिवस बैलगाडीने तर अनेक वर्षे पायी वारी केली
आपल्या प्रियजणांचे अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. प्रिय जणांच्या अस्थी विसर्जीत करताना शक्यतो नदीपात्रात व अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र याला अपवाद वराट कुटुंब ठरले आहे. झाडांच्या रूपाने सदैव नाना यांच्या स्मृती आपल्या समोर राहणार आहेत. हाच आर्दश इतरांनी घ्यावा असे गावातील जाणकार व पाहुणे रावळ्यांनी मत व्यक्त केले आहे.