जामखेड न्युज——
शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीजबील भरताना दलालांपासून सावध रहावे – मंगेश आजबे
मीटर रीडिंग प्रमाणे बील द्यावे
ज्या शेतकर्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
त्यामुळे चालू बील भरण्याचे काम सुरू आहे. पण अनेक ठिकाणी चालू बिलाच्या नावाखाली जास्त रक्कम वसूल करण्याचे काम सुरू आहे यात अनेक मध्यस्थ, दलाल व काही महावितरणचे कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांकडून जास्त रक्कम वसूल करतात बील मात्र प्रत्यक्षात कमी भरतात यामुळे बील भरताना दलालांपासून सावध राहा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश आजबे यांनी शेतकरी वर्गाला केले आहे.
चालू बील पुढील प्रमाणे
साडेसात एचपी मोटार साठी ६५००रूपये,
पाच एचपी मोटार साठी ४१००रूपये तर
तीन एचपी मोटार साठी २३००रूपये असे बील आहे मात्र अनेक दलाल व काही महावितरणचे कर्मचारी जास्त बील वसुली करतात मात्र भरणा एक महिन्याचाच करतात त्यामुळे शेतकऱ्यांनी एक बील वरीलप्रमाणे भरावे जास्त बील किंवा रक्कम कोणी मागितले तर शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश आजबे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक भागातील शेतकरी फक्त दिड ते दोनच महिने वीजपंप चालवतो बील मात्र वर्षभर त्यांच्या नावे पडते आणी आकडा वाढतो तेव्हा प्रत्येक पंपासाठी मीटर बसवावे व मीटर रीडिंग प्रमाणे बील द्यावे अशी मागणी आजबे यांनी केली आहे.
महावितरणकडे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत ठेकेदारांना रीडिंग घेण्याचे काम दिले जाते. ठेकेदाराचे कर्मचारी घरी बसुन अंदाजपंचे बील देतात यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांकडे नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.
यंदा प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच आता शेतीपंपांची बिले थकल्याने वीज वितरण कंपन्यांनी शेतीपंपांची कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला आहे. किमान थकलेली दोन बिले तरी शेतकऱ्यांनी भरावीत असे आवाहन महावितरण करत आहे.
वीज वितरण कंपन्यांच्या कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकं सुकून जात आहेत. आधी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.