जामखेड न्युज – – – –
नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होत आहे. दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच आता पुढील 3-4 दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन आठवडे संपल्यानंतरही देशात अपेक्षित थंडी पडली नाही. दिल्लीत तापमानाचा पारा 8 अंशावर गेल्यानंतर पुन्हा एकदा राजधानीत किमान तापमान वाढलं आहे.
तर पंजाब मात्र कडाक्याच्या थंडीनं गारठलं आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये थंडीची लाट आली आहे. पुढील पाच दिवस पंजाबमध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात पुढील 4 दिवस कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान 2-3 डिग्री सेल्सियसने घसरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यासह पुढील ४-५ दिवस भारतातील वायव्य आणि मध्य भारत तसेच गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. या भागातील तापमानात २-४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे.
पुढील काळात उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागातील तापमानात विशेष बदल होणार आहेत. त्यानंतर तापमानात हळू हळू घट होणारआहे. महाराष्ट्रातील उत्तर – मध्य व संलग्न मराठवाडा तसेच विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे.





