जामखेड न्युज – – –
राज्यात पावसाने दाणादाण उडाली. लाखो हेक्टरवरील पीकं पाण्यात गेलीय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. अशा परिस्थितीत राज्य सरकार मदतीचं काम तर करेलच पण केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन राज्याला निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी आता थेट पंतप्रधान मोदींचं दार ठोठावलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करुन राज्यातील नुकसानीची माहिती केंद्र सरकारला देण्याचा प्रयत्न केलाय तसंच आपल्या काकांप्रमाणेच केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यावर संकटांची मालिका असूनही ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. केंद्र सरकारने किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता राज्याला निधी द्यावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने रोहित पवार यांनी व्यक्त केली.
पावसाची दाणादाण, कधीही न भरुन येणारं नुकसान
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा व विदर्भ… आणि आज पुन्हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र… अतिवृष्टीने शेतकऱ्याला पूर्णत: घायाळ केलंय. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं अतोनात झालेलं नुकसान हे न भरून निघणारं आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या संकटाने हिरावलाय.”
अन्नदात्याला मदत करण्यासाठी जबाबदारी उचला
“आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला देईल, असा विश्वास आहे. केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी”
शेतीसाठी नवीन धोरणं आणि उपाययोजना आखाव्या लागतील
“बदलतं हवामान आणि वाढत्या आपत्ती बघता शेतीत शाश्वत उत्पन्न राहिलेलं नाही. शेतीसमोरील आव्हाने अतिशय किचकट होणार आहेत. त्यामुळं भविष्यात शाश्वत आणि परवडणाऱ्या शेतीसाठी नवीन धोरण आणि योग्य उपाययोजनाही वेळीच आखाव्या लागतील, हेही तेवढंच खरंय”, असंही रोहित पवार म्हणाले.
आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला देईल, असा विश्वास आहे. केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी.
अजित पवार काय म्हणाले?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर 50 हजार रुपये केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे”, असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.










