अहिल्यानगर घटनेचे जामखेडमध्ये तीव्र पडसाद, शहर कडकडीत बंद
अहिल्यानगर येथील धीरज परदेशी मृत्यूच्या धक्कादायक घटनेचे पडसाद जामखेड शहरात उमटले असून, घटनेच्या निषेधार्थ जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, दुकानदार तसेच नागरिकांनी बंदला प्रतिसाद देत आपापले व्यवहार बंद ठेवून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवत प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जामखेड शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विविध भागांमध्ये बंदचा परिणाम जाणवला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले असून, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
धीरज परदेशी मृत्यूच्या निषेधार्थ शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला व्यापारी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासून आपापली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि व्यापारी परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बंदला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याने जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.