शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १ लाख ९२ हजार २८२ पात्र शेतकरी
पहा तालुकावार लाभार्थी शेतकरी संख्या
राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार २८२ पात्र शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने योजनेची पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी होऊन पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळावा, यासाठी बँकेला खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार, दि. २८ जून २०२६ अखेर बँकेने ९९.८४ टक्के पात्र कर्जदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
तालुकानिहाय अपलोड करण्यात आलेल्या पात्र खात्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अकोले – १० हजार ४७८, जामखेड – ९ हजार ६३१, कर्जत – १२ हजार ३०५, कोपरगाव – ३ हजार ९५९, नगर – ९ हजार ४२५, नेवासा – २६ हजार ९९, पारनेर – ९ हजार ४८८, पाथर्डी – ८ हजार ९२०, राहुरी – १६ हजार ३४७, राहता – ६ हजार ७१८, शेवगाव – १५ हजार ७४८, संगमनेर – ११ हजार ८६, श्रीगोंदा – ४१ हजार ३८३ आणि श्रीरामपूर – १० हजार ६९५.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असून, उर्वरित खात्यांची माहितीही लवकरच अपलोड करण्यात येणार आहे.