जामखेड न्युज – – – – – –
सभापती प्रा. राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचविण्यासाठी जामखेड करांना वेठीस धरले – आमदार रोहित पवार
समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटीवरही रोहित पवारांचे गंभीर आरोप
गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. जामखेड वगळता इतर ठिकाणचे अतिक्रमणे निघतात जामखेड मधील अतिक्रमण निघत नाहीत कारण काही अतिक्रमण धारक सभापती प्रा राम शिंदे यांचे मित्र आहेत. मित्रांना वाचविण्यासाठी त्यांनी जामखेडकरांना वेठीस धरले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आज जामखेड शहरातील बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय यासह विविध कामांची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, रमेश आजबे, विजयसिंह गोलेकर, वंचित बहुजन आघाडीचे अँड अरूण जाधव, कैलास वराट, सागर कोल्हे, काका राळेभात, राजेश गोरे, इस्माईल सय्यद, नगरसेवक वसीम सय्यद व वसीम शेख,प्रविण उगले, गणेश उगले, युवराज उगले, विश्वनाथ राऊत,अँड मयुर डोके, शाकीर सय्यद, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सुतार यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विविध विकास कामांची पाहणी करून शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ते अडीअडचणी समजवून घेण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सभापती महोदय मुंबई, इंदोर येथील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेतात पण जामखेड मध्ये मात्र त्यांच्या काही मित्रांसाठी जनतेला वेठीस धरले आहे. अधिकाऱ्यांना सांगितले जाते की, मी सांगितल्या शिवाय काहीही काम सुरू करायचे नाही असे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर जामखेड करांच्या विकासासाठी करावयास हवा आहे. मित्रांच्या विकासासाठी नको..

समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटीवर रोहित पवारांचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग आणि NEET पेपरफुटी प्रकरणावर गंभीर आरोप करत राज्यातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

रोहित पवार यांनी आरोप केला की, समृद्धी महामार्ग जाहीर होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच काही अधिकारी, नेते आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात जमिनी खरेदी केल्या. रस्ता निश्चित झाल्यानंतर त्याच जमिनी मोठ्या किमतीत पुन्हा विकल्या गेल्या. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा न होता मधल्या दलालांनीच कोट्यवधींचा लाभ घेतला.





