Sunday, May 10, 2026
Home ताज्या बातम्या राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड

0
4

जामखेड न्युज – – – – – – 

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड

जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

या लोकअदालतीत मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा निपटारा होऊन सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. योगेश पैठणकर यांनी दिली.

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश व चेक अनादर प्रकरणे, बँक कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई दावे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज महावितरणाशी संबंधित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात आली होती.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ८१६ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली तर २ हजार ११६ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच विशेष मोहिमेंतर्गत ८७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३५ हजार ९३२ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, सर्व वकील संघटना, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी व विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनीही विशेष योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!