श्री नागेश विद्यालयाची दहावी परीक्षेत दमदार कामगिरी, 124 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य
निकाल 93.77 टक्के यशाने सर्वत्र कौतुक
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड ने दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल तब्बल 93.77 टक्के लागला असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेस विद्यालयातून एकूण 225 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये 51 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. तसेच द्वितीय श्रेणीमध्ये 29 विद्यार्थी तर पास श्रेणीत 07 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे सर्व स्तरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले असून प्रथम क्रमांक सार्थक विजयकुमार चौधरी यांनी 94.20 टक्के गुण मिळवत पटकावला आहे. द्वितीय क्रमांक सिद्धांत बळभीम फरताडे यांनी 93.60 टक्के गुणांसह मिळविला. तृतीय क्रमांक रामकृष्णा सोनबा कोल्हे व पवार ऋषिकेश चंद्रकांत यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या पटकावला. शिंदे सार्थक सचिन या विद्यार्थ्याला गणित विषयात 100 पैकी 100 मार्क मिळाले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , आमदार रोहितदादा पावर,उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, प्राचार्य मडके बी. के., पर्यवेक्षक जाधवर एस. व्ही., शालेय व्यवस्थापन समिती, शालेय विकास समिती, पालक संघ, माता पालक संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती, सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
विद्यालयाची शैक्षणिक व भौतिक वैशिष्ट्ये हीच यशामागील प्रमुख ताकद मानली जात आहे. ए.आय. आधारित शिक्षण, एनएमएसएस परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, आरटीएस परीक्षा, नवोदय व गुरुकुल विभाग, विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रम, क्रीडा स्पर्धा, एनसीसी (आर्मी) युनिट, आरो फिल्टर पाणी सुविधा, आधुनिक संगणक लॅब, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षकवर्ग यामुळे विद्यालयाने गुणवत्ता आणि प्रगतीचा उच्च स्तर कायम राखला आहे.
विद्यालयाच्या या भव्य यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून श्री नागेश विद्यालयाची उज्ज्वल यशपरंपरा पुढील काळातही अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.