जामखेड शहरातील एका सराफ व्यावसायिकाची तब्बल 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विलास चिंतामणी (वय 49, रा. कोर्ट रोड, जामखेड) हे वैशाली ज्वेलर्स नावाचा सराफी व्यवसाय चालवतात. दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारास आप्पासाहेब ज्ञानदेव देवकाते (रा. काटेवाडी) हा त्यांच्या दुकानात आला.
त्याने आपला मित्र धम्मसागर हिरालाल समुद्र (रा. सारोळा) याने आयसीआयसीआय बँकेत घेतलेले गोल्ड लोन सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून चिंतामणी यांनी 13 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, संबंधित रक्कम परत न करता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.
या प्रकारात आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) यांनीही संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 154/202 तसेच 318(4), 316, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.