Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रेमाच्या कवितांबरोबरच इतर कवितांनी जामखेडकर मंत्रमुग्ध राज्यातील नामवंत...

राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रेमाच्या कवितांबरोबरच इतर कवितांनी जामखेडकर मंत्रमुग्ध राज्यातील नामवंत कवींच्या उपस्थितीत जामखेड मध्ये कवी संमेलन उत्साहात संपन्न

0
562

जामखेड न्युज——

राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रेमाच्या कवितांबरोबरच इतर कवितांनी जामखेडकर मंत्रमुग्ध

राज्यातील नामवंत कवींच्या उपस्थितीत जामखेड मध्ये कवी संमेलन उत्साहात संपन्न

 

कवीवर्य कै. आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडच्या वतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन गुरुवार दि. 6/02/ 2025 रोजी जामखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी मा. विजयकुमार मिठे हे होते. मराठी साहित्य प्रतिष्ठानचे हे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मा.प्रकाश होळकर व डॉ.राजेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ पुरस्कार वितरण, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सायंकाळी राज्यभरातील नामवंत कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कवी संमेलन संपन्न झाले. यात जामखेड मधील डॉ. जतीन काजळे, गोकुळ गायकवाड, रंगनाथ राळेभात, मारूती काळदाते, डॉ. संजय राऊत, कुंडल राळेभात यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

कवी संमेलनाचे अध्यक्ष शंकर वाडेवाले हे होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत चांदगुडे, संतोष सेलुकर यांनी केले.

नामवंत कवींनी या कविता केल्या सादर

शंकर वाडेवाले

किती दळावं दळण
दाणे रडती जात्यात
रगुताचे पाजळणे
खडीसाखरी नात्यात

मंदिराच्या गाभाऱ्यात
येई मरणाला चेव
लाविला मी लेप तुझा
मरणाचं काय भेव

डाॅ.संतोष सेलूकर,परभणी

बंगल्यासमोर‌ मजला दिसते थोडी उणीव आता
चकचकीत फरशी बघून येते मज कीव आता
होऊ दे दारी चिखल
भरुदे मातीत पाय तरी
अंगणातल्या काळ्या
मातीतच गुंततो माझा जीव‌ आता
माती सजीव आहे मातीस जीव लावा
बदलून रुप ये त्या कातीस जीव लावा
ही जात आमुची नाही काम टाळणारी
कष्टात राहते त्या जातीस जीव लावा

रामदास कांबळे, लातूर.

बाप असतो घराचा चाक
माय वंगण त्या चाकाचे
ना कपडा अंगभर, ना सुर तक्रारीचे
मायला ठिगळाची साडी
पोरांची हौस भागवून
बाप माझा कणकण झिजतो
भाळावर दुष्काळ घेऊन
खिसा रिकामा तरी, राही आबादानी

प्रा भगवान आमलापुरे

चला मी तुम्हाला परळीला नेऊन आणतो.
ती माझी कर्मभूमी मी थोडं बहुत जाणतो.

नारायण खानसोळे

आमच्या आनंदात
अडसर ठरलेल्या,
संवेदना, तेवढ्या
लोहराकरून
सडकून आण ?
त्या एकदा बोळ
झाल्या की,
आम्ही नाच काय?,
तांडव नृत्य करायला मोकळे.?!!.

विठ्ठल सातपुते
मुक्या दगडाची देवं
नाही नवसा पावली
भरल्या रानातली विहीर
तिच्या मुक्तीस धावली !

विठ्ठल तात्या संधान यांची शेत शाळा कविता
शेतकर्याच्या मुलांची
गावशिवारच विद्यापीठ असतात
शेतच त्यांची शाळा असते
मातीच त्यांची पाटी असते
अवजारेच त्यांची लेखणी असते
नांगराच्या फाळाने मातीत शिराव
तशी मनात अलगद शिरत जाते
त्याची कविता
वखराच्या पासीन तशी
मनात माजलेली तण वखरत जाते
त्याची कविता
पाभरीच्या चाड्यातुन बी पेरावे
तशी ओळीत शब्दांना पेरत जाते
त्याची कविता
तासात बियांनी उगवाव तस
ओळी शब्दांना जोडत जाते
त्याची कविता
कणसात दाण्यांनी भरावं
तशी मनात भरते
त्याची कविता
पावसाच्या पाण्याने ढेकळांना विरघळाव
तशी मनात विरघळत
जाते त्याची कविता
मातीवर कोरलेलं मातीतल जगणं
मातीमय होवून जाते
त्याची कविता.

हनुमंत चांदगुडे
बाप रगात होऊन, रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो

नागेश शेलार
ज्याच्यावर विश्वास भारी
तोच वक्तला धोका देतो
रक्ताच्या नात्याचाही
कलंक काजळी होतो
गार्भातही आज आईच्या
निर्भय बाळ राहिले नाही
कुठल्याच गावचे रस्ते
सरळ राहिले नाही…

डॉ.संजय राऊत
एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता
कवी महाशय सांगा न तुम्ही कुठे राहता

मी ही थोडा बावरलो भल्तच हे अघटीत
डायरेक्ट पत्ता विचारते बाई पहिल्यच भेटीत

हळूहळू जीव गुंतला रोज फोन यायचा
घरात असल्यावर जीव धाकधूक व्हायचा

कळल जर बायकोला तर आपलं काही खरं नाही
या वयात प्रेम करणे हे काही बर नाही

बाबासाहेब सौदागर

सांजवेळी साजणाने घातली ग गळ…..

सांजवेळी साजणाने घातली ग गळ…..आभाळाने नेली माझी निळी चंद्रावळ…..हिमरंगी पाणी बाई आलं घाटातूनसळाळली सोनसळा ऊन पांघरूनऋतुमती करणीची घातली ग शिळ…ओढ्याला मी दिला देह गेले भोवऱ्याततुरे गवताचे मला हासले वाऱ्यातजांभळ्या ग खडकाला हिरवं शेवाळ…

श्रृंगाराच्या चांदण्यात घातलं ग न्हावूचिरेबंदी वाड्यावर सांगा कशी जाऊ

मालवेना मनातून पेटलेला जाळ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!