पांडुरंग भोसले व शेकडो विद्यार्थ्यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच भोसले यांची प्रकृती बिघडली, एक मुलगीही बेशुद्ध, प्रशासन सुस्तच

0
848

जामखेड न्युज——

पांडुरंग भोसले व शेकडो विद्यार्थ्यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच

भोसले यांची प्रकृती बिघडली, एक मुलगीही बेशुद्ध, प्रशासन सुस्तच

 

रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या सर्व शाखा विद्यार्थ्यांचे स्थलांतराचा प्रश्न तीन महिन्यांपासून लोंबकळत अधातरीच आहे. तीन महिन्यांपुर्वी नऊ दिवस विद्यार्थ्यांसमवेत उपोषण केले होते त्यावेळी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री व प्रशासनाने दिलेले आश्वासने हवेतच विरली आहेत. प्रशासनास पांडुरंग भोसले यांच्या प्रकृतीचे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काहीही देणेघेणे नाही. आज पाच दिवस झाले तरीही उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. आज भोसले यांची प्रकृती बिघडल्यामुळे सलाईन लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मते विद्यापीठ प्रशासन आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. व रत्नदीप काॅलेज प्रशासनास सहकार्य करत आहे.

आज अचानक एका आंदोलन कर्त्या मुलीला चक्कर येऊन बेशुद्ध पडली तीला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

२०२५ शैक्षणिक वर्ष लवकरच चालू होत आहे परंतु रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये स्थलांतरीत करुन कॉलेजने वसूल केलेल्या फिसचा प्रश्न तीन महिन्यां पासून प्रलंबित आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण झाले त्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यास कॉलेज टाळाटाळ करत आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये व त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी कॉलेजच्या विद्यार्थी समवेत जामखेड तहसील कार्यालयासमोर गुरूवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने राज्यातील विविध विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाखा सुरू करून विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचे आर्थिक , मानसीक, शारिरीक शोषण करून खूप मोठे नुकसान केले आहे. त्या संदर्भात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे दोन्ही शाखेतील सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ सर्व संघटना यांनी मार्च २०२४ मध्ये दीर्घ काळ आंदोलन व पांडुरंग भोसले यांनी आमरण उपोषण केल्यानंतर त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री, विद्यापीठ, जिल्हाधिकारी अहमदनगर, आमदार रोहीत पवार आमदार राम शिंदे, तत्कालीन आमदार निलेश लंके यांनी दखल घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व या विश्वासावर हे आंदोलनं स्थगित केले होते.

सदर घटनेला तीन महीने होऊन देखील सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न न सुटल्याने जामखेड तहसील कार्यालयासमोर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने विद्यार्थ्यांसमवेत उपोषण सुरू केले आहे.

काय आहे प्रकरण

रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने नर्सरी कॉलेज,बिएएमएस, बीएचएमएस, बि फॉर्मसी,डि फॉर्म्ससी असे विविध कॉलेज असून राज्यातील बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आर्थिक लुट तसेच परिक्षेत कमी मार्क देणे, शिक्षकांची कमतरता तसेच विद्यार्थीनीना ब्लॅकमेल करणे असा आरोप विद्यार्थ्यांनी करून तीन मार्च रोजी जामखेड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले व विविध संघटना राजकीय पक्ष यांनी पाठिंबा दिला होता. पाच विद्यार्थीनींनी शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून विनयभंगाची तक्रार दाखल केली व गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. पोलिसांनी डॉ. भास्कर मोरे यास दि.१४ मार्च रोजी भिगवण ता. इंदापूर जि. पुणे येथून अटक केली होती. त्यास ७३ दिवसानंतर न्यायालयाने मोरे यास जामीन देताना साक्षीदारांना भेटण्याचा अथवा दबाव आणू नये तसेच फिर्यादीची साक्ष न्यायालयात होई पर्यंत जामखेड शहर व तालुक्यात न्यायालयाची तारीख वगळून प्रवेश करू नये या अटी व शर्तीचा भंग केल्यास जामीन रद्द होऊ शकतो असा आदेश जामीन बाबत दिला होता.

आता परत पांडुरंग भोसले व शेकडो विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत. पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, विद्यापीठ प्रशासन सुस्तच आहे त्यांना याबाबत कसलेही देणेघेणे नाही. पांडुरंग भोसले व सुमारे तीनशे विद्यार्थी उपोषण करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here