जामखेड न्युज——
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
कालपासून वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट सुरू आहे त्यामुळे अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात दि. 07/03/2023 ते दि. 09/03/2023 या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
1) मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
3) मोकळे मैदान, झाडाखाली टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.
4) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
5) अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
6) शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
7) जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
सर्व नागरीकांनी बादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल
याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री) 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.
असे आवाहन राजेंद्रकुमार पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी केले आहे. तरी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी.