Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ‘आमच्या मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका’

‘आमच्या मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका’

0
330
जामखेड न्युज – – – – 
संपूर्ण राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणी शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे. आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिर्डीतील मुस्लीम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरु करावी, असे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुवारी पहाटे स्पीकरविनाच काकड आरती संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची मुभा आहे. त्यामुळे आज काकड आरतीच्यावेळी मंदिरात स्पीकर लावण्यात आला नाही. मात्र, या निर्णयामुळे शिर्डीत येणारे साईभक्त नाराज झाले आहेत. आज नेहमीप्रमाणे मंदिराच्या बाहेर काकड आरती ऐकू येत नव्हती. त्यामुळे मंदिराबाहेर रांगेत असणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मंदिर आणि मशिदींच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मुस्लीम समाजाच्या मागणीनंतर शिर्डीच्या मंदिरातील काकड आरतीसाठी विशेष मुभा दिली जाणार का, हे पाहावे लागेल.
भोंग्यांच्या वादामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणच्या मंदिरातील सकाळच्या काकड आरत्या लाऊड स्पीकरविना पार पडल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक देवस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जात होती. पण आज भोंग्याचं निमित्त करून भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने (राज ठाकरे) हिंदूंचा गळा घोटला आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!