एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन परबांनी  दिला शेवटचा इशारा

0
219
जामखेड न्युज – – – – 
दिवाळीपासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. तीन महिन्यांपासून सरकार आणि एसटी संपकरी यांच्यात कित्येक चर्चा पार पडल्या. पण यातून संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने संपकरी अजुनही आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करत शेवटचा इशारा दिला आहे.
                     ADVERTISEMENT
संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31 मार्च 2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असं आवाहन केलं आहे. तसेच कामावर रुजू होण्याचा हा अखेरचा पर्याय आणि शेवटचा इशारा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती आणि अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले.
पगारवाढीबाबतही दिली माहिती
यावेळी परब यांनी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यावरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 7%, 14% 21% वरुन 8%, 16% आणि 24% टक्के करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये 5000, रुपये 4000 व रुपये 2500 अशी वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत होणार
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये 7000 ते 9000 रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जादा भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने घेतली असल्याची माहितीही मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहाला दिली.
तसेच संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना 2500 ते 5000 रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. यामुळे महामंडळावर सुमारे 24 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here